नाशिक, (प्रतिनिधी) २४ मार्च - कस्तुरीसाठी हरणाची शिकार, महिलांचे लैंगिक शोषण आणि तब्बल पाच नरबळी दिल्याचा खळबळजनक संशय... एखाद्या क्राईम थ्रिलरलाही लाजवेल असा भोंदूबाबा अशोक खरातचा 'काळा कच्चाचिट्ठा' आता न्यायालयासमोर उघड झाला आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात खरातच्या कृत्यांचा पाढाच वाचला असून, न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
छाप्यामध्ये काय काय सापडले?
पोलिसांनी अशोक खरातच्या घरावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक वस्तू हस्तगत केल्या आहेत:
रोख रक्कम: ६ लाख ५३ हजार रुपये.
शस्त्रसाठा: एक काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर आणि ३१ जिवंत काडतुसे.
इतर वस्तू: लॅपटॉप, राजमुद्रा आणि काही डिजिटल उपकरणे.
पुरावे: एसआयटीच्या (SIT) हाती काही महत्त्वाचे पेन ड्राईव्ह आणि डिजिटल डेटा लागला असून, त्यातून अनेक गुपिते बाहेर येण्याची शक्यता आहे.
महिलांचे शोषण आणि पूजेचा बनाव
अशोक खरात हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी धर्माचा आणि पूजेचा आधार घ्यायचा. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार:
तो महिलांना मधामध्ये गुंगीचे पदार्थ मिसळून द्यायचा.
शुद्ध हरपल्यानंतर तो संबंधित महिलांचे शारीरिक शोषण करायचा.
विशेष म्हणजे, या तथाकथित पूजा विधींचे आयोजन मुद्दाम मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी केले जात असे, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.
कस्तुरी मृगाची हत्या आणि नरबळीचा संशय
खरातकडे हरणाची कातडी आणि कस्तुरी सापडल्याने त्याने कस्तुरीसाठी हरणाची हत्या केल्याचा दाट संशय आहे. ही कस्तुरी तो नेमकी कुठून मिळवायचा, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, खरातने आतापर्यंत पाच नरबळी दिल्याचा संशय आहे. या विधानाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत ८ गुन्हे दाखल
भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आतापर्यंत विविध कलमांखाली ८ गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या या 'काळ्या साम्राज्यात' आणखी कोणाकोणाचे हात गुंतले आहेत, याचा शोध एसआयटी घेत आहे.
पुढील तपास: पोलिसांनी खरातच्या ७ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, ज्यावर न्यायालयाने २९ मार्चपर्यंत कोठडी मंजूर केली आहे. या काळात नरबळीचा संशय आणि शस्त्रास्त्रांचा स्रोत यावर पोलीस प्रकाश टाकतील.
भोंदू कॅप्टन खरातच्या वाढीव पोलीस कोठडीवर अंनिसची प्रतिक्रिया :
“सरकारी वकिलांनी पाच नरबळीची शंका उपस्थित करणे हे अतिशय गंभीर बाब आहे. पुरोगामी महाराष्ट्राला कलंक असणारी ही घटना आहे.यासाठीच जादूटोणा विरोधी कायद्याची गरज अधोरेखित होत आहे.आम्ही एस आय टी कडे वन्यजीव संबधात व्यक्त केलेली शंका खरी ठरली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम लावले जावे.”
-कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस