नाशिक, (प्रतिनिधी) ६ फेब्रुवारी - नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी विलास शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) नाशिकमध्ये अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाला आहे. पक्षाचे महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे. "आम्ही कुठे कमी पडलो?" असा भावनिक प्रश्न उपस्थित करत त्यांनी जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नाराजीचे नेमके कारण काय?
नाशिक महापालिकेत उपमहापौर पदासाठी अनेक इच्छुकांच्या नावांची चर्चा होती. मात्र, काही काळापूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या विलास शिंदे यांची या पदावर वर्णी लागल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तिदमे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर भर दिला आहे:
१. अजय बोरस्ते: सव्वा वर्ष 'निगोसिएशन' करून पक्षात आले, तरीही त्यांना जिल्हा प्रमुख, उपनेते, महामंडळ आणि गटनेते अशी अनेक पदे मिळाली.
२. विलास शिंदे: लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात प्रवेश करूनही त्यांना संपर्क प्रमुख आणि आता थेट उपमहापौर पद देण्यात आले.
संघर्ष विरूद्ध संधी; तिदमे यांनी मांडली व्यथा
प्रवीण तिदमे यांनी आपल्या पोस्टमध्ये संघर्षाचा पाढाच वाचला आहे. "जेव्हा नाशिकमध्ये कुणी उघडपणे पुढे येत नव्हतं, तेव्हा भविष्याची चिंता न करता मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. पक्षवाढीसाठी नोकरी सोडली, शाखाप्रमुखापासून महानगरप्रमुखापर्यंत प्रवास केला. उबाठा गटाशी थेट संघर्ष केला, मग आज आम्हालाच डावलले का जातेय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पोस्टमधील महत्त्वाचे मुद्दे:
निष्ठा आणि संघर्ष: "संघर्ष पदासाठी नव्हे तर संघटना उभी करण्यासाठी केला."
अनन्यावर भाष्य: "दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना पदांचा पाऊस, मग मूळ कार्यकर्त्यांचे काय?"
भविष्यातील संकेत: "आज अन्याय सहन करतोय, बंड करत नाही, पण मन जड आहे."
पक्षांतर्गत समीकरणे बदलणार?
बंटी तिदमे यांच्या या भूमिकेमुळे नाशिकमधील शिंदे गटात 'जुने विरुद्ध नवे' असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तिदमे यांनी थेट शिंदे यांना विचारलेला हा प्रश्न केवळ त्यांचा वैयक्तिक नसून, अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनातील खदखद असल्याचे बोलले जात आहे. ऐन महापालिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी मुख्यमंत्री कशी दूर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"आम्ही जास्त विश्वास ठेवला की स्वतःसाठी मागणं शिकू शकलो नाही? आज अन्याय सहन करतोय पण निष्ठा बदललेली नाही. साहेब, फक्त एवढंच सांगा - आम्ही कुठे कमी पडलो?"
— प्रवीण (बंटी) तिदमे, महानगरप्रमुख, शिवसेना (नाशिक)