दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २३ जुलै - नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गोदावरी नदीला पूर आला आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाण्याची आवक वेगाने वाढली असून प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. जोरदार वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून विसर्गात सातत्याने वाढ
गंगापूर आणि गौतमी गोदावारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी ६ वाजेपासून पावसाचा जोर कायम आहे. गौतमी धरणातून होणारा विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील पाण्याची सुमारे १३,००० क्यूसेक आवक गंगापूर धरणात होत आहे. ही आवक आणि जावक नियंत्रित करण्यासाठी आज, २३ जुलै रोजी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे:
सकाळी ९:३० वा.: ४,२३६ क्यूसेक
सकाळी १०:३० वा.: ६,३५४ क्यूसेक
सकाळी ११:०० वा.: ७,४१३ क्यूसेक
महत्त्वाची नोंद: गंगापूर धरणातून दर अर्ध्या तासाला १,००० क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात येत असून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे.
हरणबारी भरले; मोसम नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट
बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून ६,२२१ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे हरणबारीच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, मोसम नदीकाठचे नागरिक आणि मालेगाव महापालिका हद्दीतील मोसम नदीकाठच्या रहिवाशांनी आपली जनावरे व किमती सामान सुरक्षित स्थळी हलवावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरडी कोसळल्या; रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत
जिल्ह्यात ठिकठिकाणी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे:
त्र्यंबक - जव्हार महामार्ग: या महामार्गावर मड स्लाईड (चिखल व माती) होऊन रस्त्याची एक बाजू बंद झाली होती. मात्र, प्रशासनाने तात्काळ जेसीबी पाठवून रस्ता मोकळा केला असून आता वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली आहे.
इगतपुरी (भामधरण ते मांजरगाव रोड): या रस्त्यालगत दरड कोसळत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
भावली डॅम रस्ता: दारणा नदीवरील भावली धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
धरण क्षेत्रातील विसर्ग आणि नद्यांची वाढती पातळी लक्षात घेता, नदीकाठच्या रहिवाशांनी नदीपात्रात उतरू नये. पूरसदृश परिस्थितीत अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.