मुंबई, (प्रतिनिधी) १ फेब्रुवारी - राज्याच्या राजकारणात सध्या सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उपमुख्यमंत्रिपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्ती भाजपच्या माध्यमातून सत्तेत येत असेल, तर तो पूर्णपणे त्यांचा पक्षांतर्गत आणि कौटुंबिक विषय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
शरद पवार जे बोलत आहेत, तेच वास्तव!
अजित पवार यांचा गट हा एक स्वतंत्र गट असून त्या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडलेली भूमिका हीच वस्तुस्थिती आहे, असे राऊत यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेल्या कायदेशीर आणि राजकीय पेचावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, "अजित पवारांच्या गटाने आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे शरद पवार जे वास्तव मांडत आहेत, ते नाकारता येणार नाही."
उपमुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत माहिती नाही
सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी, याबाबत अद्याप कुणाकडेही अधिकृत माहिती नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. "कुणी उपमुख्यमंत्री होणार असेल किंवा कोणाची वर्णी लागणार असेल, तर तो निर्णय अजित पवार यांचा पक्ष आणि भाजप घेईल. महाविकास आघाडी म्हणून आमचा त्या विषयाशी संबंध नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवारांचा निर्णय, भाजपचे माध्यम
अजित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीला सत्तेत वाटा मिळणे हे भाजपच्या रणनीतीचा भाग असू शकते, असे संकेतही राऊत यांनी दिले. मात्र, "जर एखादी व्यक्ती भाजपच्या माध्यमातून सत्तेत जात असेल, तर त्याबद्दल त्यांच्या पक्षाने उत्तर द्यावे," असे सांगत राऊत यांनी या वादापासून अंतर राखणे पसंत केले.
राज्यातील सत्तासंघर्ष आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.