मुंबई, (प्रतिनिधी) १८ जुलै - राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला असून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
तारीखनिहाय कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
१८ जुलै: छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील.
१९ जुलै: अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे.
प्रशासनाकडून नागरिकांसाठी नियमावली:
हवामान विभागाने विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे. विजा चमकत असताना उघड्या मैदानावर जाणे टाळावे, कोणत्याही झाडाखाली आश्रय घेऊ नये, आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे. तसेच स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.