नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ७ जुलै - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना 'बिंतांग अदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया' (Bintang Adipurna of the Republic of Indonesia) या इंडोनेशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल हा सर्वोच्च बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि इंडोनेशियातील जनतेला तसेच दोन्ही देशांमधील प्रदीर्घ सांस्कृतिक संबंधांना समर्पित केला आहे.
इस्तना मर्डेका येथे भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी 'इस्तना मर्डेका' (राष्ट्रपती भवन) येथे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. जानेवारी २०२५ मध्ये भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून अध्यक्ष प्रबोवो यांनी भारताचा दौरा केला होता, त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट आहे.
व्यापार, संरक्षण आणि डिजिटल क्षेत्रावर चर्चा
दोन्ही नेत्यांमध्ये प्रतिनिधी-स्तरीय अधिकृत चर्चा झाली. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सहकार्य, डिजिटल तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य आणि अवकाश क्षेत्रातील भागीदारीचा आढावा घेण्यात आला. भारताच्या 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ONDC) वर आधारित 'इंडोनेशिया ओपन नेटवर्क' (ION) च्या शुभारंभाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.
१३ महत्त्वाचे सामंजस्य करार
या ऐतिहासिक चर्चेनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत एकूण १३ क्षेत्रांतील सामंजस्य करारांची (MoUs) देवाणघेवाण करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने:
संरक्षण आणि सागरी सुरक्षा
अंतराळ (स्पेस) आणि दूरसंचार
महत्त्वाची खनिजे आणि दुर्मिळ मूलद्रव्ये
विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण
कृषी आणि पोलाद पुरवठा साखळी
आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य सहकार्य
याशिवाय, योग्याकार्ता येथील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रसिद्ध 'प्रंबनन मंदिर संकुलाच्या' संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी भारत सहकार्य करणार असून, त्याबाबतच्या इरादापत्राची (Letter of Intent) देखील देवाणघेवाण करण्यात आली.
महत्त्वाच्या घोषणा:
टागोर-देवांतरा वर्ष (२०२७): वर्ष २०२७ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या इंडोनेशिया भेटीचे शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. हे वर्ष दोन्ही देश संयुक्तपणे "सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुत्सद्देगिरीसाठी टागोर-देवांतरा वर्ष" म्हणून साजरे करतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
ब्रिक्स (BRICS) अध्यक्षपदाला पाठिंबा: वर्ष २०२६ मधील भारताच्या ब्रिक्स (BRICS) अध्यक्षपदाला इंडोनेशियाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अध्यक्ष प्रबोवो यांनी जाहीर केले.
'महासागर' संकल्पना: मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित हिंद-प्रशांत क्षेत्राप्रति कटिबद्धता दर्शवत पंतप्रधानांनी भारताच्या 'महासागर' (MAHASAGAR) या संकल्पनेवर भर दिला.
चर्चेनंतर अध्यक्ष प्रबोवो यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ विशेष भोजनाचे आयोजन केले होते. पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानत अध्यक्ष प्रबोवो यांना पुन्हा भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे.