नाशिक, (प्रतिनिधी) ७ जुलै - मध्य रेल्वेने भुसावळ, जळगाव आणि मनमाड मार्गे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि गर्दीचा विचार करून, रेल्वे प्रशासनाने बडनेरा-नाशिक रोड-बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष मेमू (MEMU) रेल्वे सेवेचा परिचालन कालावधी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूर्वी १५ जुलैपर्यंत धावणारी ही विशेष रेल्वे आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत नियमित सुरू राहणार आहे. यामुळे या मार्गावरील दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना आणि व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.
दोन्ही बाजूंच्या मिळून होणार १३४ फेऱ्या
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, खालील दोन्ही गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे:
१. गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष
२. गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड-बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष
वाढवण्यात आलेल्या या अडीच महिन्यांच्या कालावधीत दोन्ही गाड्यांच्या मिळून एकूण १३४ फेऱ्या होणार आहेत.
वेळापत्रक आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या गाडीच्या मूळ वेळापत्रकात, मार्गात किंवा निर्धारित थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या वेळेत आणि नेहमीच्याच थांब्यांवरून या रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे.
नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठा दिलासा
बडनेरा-नाशिक रोड विशेष मेमू रेल्वे गाडीला गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर दररोज नोकरी, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच इतर कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड या महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ही अनारक्षित विशेष रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरत आहे. आता मुदतवाढ मिळाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.