नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ५ जुलै - परदेशात किंवा जहाजावर मृत्यू झालेल्या एका भारतीय नाविकाच्या मृतदेहातून काही महत्त्वाचे अवयव गहाळ झाल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची सागरी प्रशासन महासंचालनालयाने (DGMA) अत्यंत गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. या संवेदनशील प्रकरणामुळे सागरी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तत्काळ कारवाईचा भाग म्हणून, संबंधित नाविकाची नियुक्ती करणाऱ्या 'भरती आणि नियुक्ती सेवा परवाना एजन्सीला' (RPSL) या नाविकाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे आणि जुन्या नोंदी तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महासंचालनालयाने प्राथमिक चौकशी सुरू केली असून, उपलब्ध माहितीची सक्षम अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जात आहे.
पोलीस अधीक्षकांकडे विषय सादर; फौजदारी कारवाईची तयारी
प्रकरणाचे गांभीर्य आणि गुन्हेगारी स्वरूप लक्षात घेऊन, 'डीजीएमए'ने या प्रथमदर्शनी आरोपांची कायदेशीर चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकारक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांकडे (SP) अधिकृतपणे हा विषय मांडला आहे. पोलिसांच्या माध्यमातून या प्रकरणाची गुन्हेगारी बाजू तपासली जाणार असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
दोन सर्वेक्षकांची समिती; १० दिवसांत अहवाल
या प्रकरणाचे स्वतंत्र, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन व्हावे, यासाठी डीजीएमएने मंजूर केलेल्या संदर्भ शर्तींनुसार (Tor) चौकशी करण्यासाठी दोन विशेष सर्वेक्षकांची (Surveyors) नियुक्ती केली आहे. या चौकशी समितीला पुढील १० कामकाजाच्या दिवसांत आपला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांची सखोल तपासणी करून पुढील कारवाईसाठी संबंधित यंत्रणांकडे विषय पाठवला जाईल.
उल्लंघन झाल्यास आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कठोर कारवाई!
'सागरी कामगार करार' (MLC) किंवा खलाशांचे कल्याण, प्रमाणपत्र आणि हक्क यांच्याशी संबंधित इतर कोणत्याही लागू असलेल्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय करारांमधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास, लागू असलेल्या कायदेशीर आणि नियामक चौकटीनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चार महासंचालनालयाने केला आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे 'DGMA'चे आवाहन
भारतीय नाविक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हिताचे रक्षक म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगत महासंचालनालयाने माध्यम प्रतिनिधी आणि सर्व संबंधित घटकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. "वाचक आणि जनतेमध्ये अनावश्यक चिंता निर्माण होईल किंवा जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी कोणतीही खातरजमा न झालेली किंवा चुकीची माहिती पसरवू नये. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, जेणेकरून पीडित कुटुंब आणि भारतीय नाविकांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होणार नाही," असे आवाहन 'DGMA'ने केले आहे.