नसरापूर बालिका हत्या प्रकरण... नराधम भीमराव कांबळेला कोर्टाने सुनावली ही शिक्षा...

Share:
Main Image
Last updated: 29-Jun-2026

पुणे, (प्रतिनिधी) २९ जून - नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज 'फाशीची शिक्षा' सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने यापूर्वीच आरोपीला दोषी ठरवले होते, त्यानंतर आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या खटल्यामध्ये न्यायालयाने या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर व अमानुष असल्याचे नमूद करत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, १ मे रोजी ही संतापजनक घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत तपास, ठोस पुरावे गोळा करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आज अंतिम निकाल देण्यात आला. अत्याचार आणि हत्या प्रकरणांमध्ये राज्यातील सर्वात जलद गतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक खटला ठरला आहे.

१ मे रोजी घडली होती संतापजनक घटना

१ मे रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. आरोपीला तात्काळ आणि फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. जनतेचा हा आक्रोश लक्षात घेऊन पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण केला व न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या गवाहीमुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला.

न्यायालयात काय घडले? (१३७ पानांचा निकाल)

विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात आज शिक्षेवरील अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी भीमराव कांबळे याला कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी कोर्टात प्रवेश करताच अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद अत्यंत सविस्तरपणे ऐकून घेतला.

Advertisement

बचाव पक्षाचा युक्तिवाद: बचाव पक्षाचे वकील अजय मिसर यांनी आरोपीची बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाच्या १२ महत्त्वाच्या निकालांचे दाखले देत फाशी ऐवजी पर्यायी शिक्षेची मागणी केली.

सरकारी पक्षाचा पलटवार: सरकारी पक्षाने देखील या गुन्ह्याचे क्रौर्य अधोरेखित करत सर्वोच्च न्यायालयाच्या १२ विविध खटल्यांचे संदर्भ दिले आणि हा खटला 'दुर्मिळातील दुर्मिळ' (Rarest of Rare) असल्याचे सांगत केवळ आणि केवळ मृत्युदंडाचीच मागणी केली.

न्यायालयाने दोन्ही बाजूंची मांडणी आणि पुराव्यांचे अवलोकन करून १३७ पानांचा सविस्तर निकाल (Judgment) तयार केला आणि अखेर नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली.

पीडित कुटुंबाला न्याय, पण जनजागृतीची गरज!

या ऐतिहासिक निकालामुळे पीडित चिमुकलीच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. सोशल मीडिया आणि संपूर्ण जिल्ह्यातून या निकालाचे स्वागत होत असले, तरी अशा विकृत घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याची केवळ कठोर अंमलबजावणीच नव्हे, तर समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.