जळगाव, (प्रतिनिधी) २८ जून - हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (कॅचमेंट एरिया) गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याच्या आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही परिस्थिती पाहता हतनूर धरणातून पुढील काही तासात तापी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जळगाव पाटबंधारे विभागाने तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्रशासनाचे नदीकाठच्या नागरिकांना आवाहन
धरणातून होणारा संभाव्य विसर्ग लक्षात घेता, नदीकाठच्या गावातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व खबरदारी बाळगावी. नदी पात्रात कोणीही उतरू नये, तसेच आपले पशुधन सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.