नाशिक, (प्रतिनिधी) २२ जून - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत अत्यंत अभूतपूर्व आणि धक्कादायक निकाल हाती आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा प्रचंड धक्का बसला असून, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असली तरी गोकुळ गीते यांचा विजय आता निश्चित झाला आहे. या धक्कादायक निकालानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून वेगवान घडामोडींना सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्येच आकडेवारी स्पष्ट झाली आणि गोकुळ गीते यांनी दराडे यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली. महायुतीचा अधिकृत उमेदवार पराभूत झाल्याने सत्ताधाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
'विशेष विमानाने मुंबईला या'; उदय सामंतांचा फोन
नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सूत्रे हलवत नवी राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. निकाल स्पष्ट होताच मंत्री उदय सामंत यांनी थेट गोकुळ गीते यांना फोन करून "विशेष विमानाने तातडीने मुंबईला या," असा सांगावा धाडला आहे. यासंदर्भातील राजकीय चर्चांचे रील आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे.
गोकुळ गीते 'शिवसेनेत' प्रवेश करणार?
मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार, अपक्ष निवडून आलेले गोकुळ गीते यांना आपल्या गोटात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेेनेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. गोकुळ गीते हे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अधिकृत उमेदवार पडला तरी तांत्रिकदृष्ट्या ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे.
मंत्र्यांच्या मनधरणीला यश, पण बंडखोरी कायम राहिल्याने गेम उलटला!
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांनी गीते बंधूंची मनधरणी करण्याचे अथक प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही गीते बंधूंची बैठक झाली होती. त्यावेळी गणेश गीते यांनी अर्ज मागे घेतला खरा, मात्र गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिले. नेत्यांना वाटले की बंडखोरी शमली आहे, मात्र स्थानिक पातळीवर मतदारांनी गोकुळ गीते यांच्या पारड्यात कौल दिल्याने महायुतीचे सर्व गणित उलथवून लावणारा निकाल समोर आला आहे.