मुंबई, (प्रतिनिधी) १५ जून - स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान मिळाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन आणि खासगी क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विकासाचे फायदे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत आहेत. जलसंवर्धन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने केलेले कार्य राज्याच्या विकास उद्दिष्टांना पूरक ठरत आहे. या उपक्रमांच्या एकूण लाभार्थ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५२ टक्क्यांहून अधिक असून, महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये (ज्यात ७५% आकांक्षी जिल्ह्यांचा समावेश आहे) हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.
बँकेच्या सामाजिक कामगिरीचा 'रिपोर्ट कार्ड'
जलसुरक्षेसाठी व्यापक उपाययोजना
पाणी साठवण क्षमता: दुष्काळी भागांवर विशेष भर देत तब्बल १.०६ अब्ज लीटर गोड्या पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली.
वॉटर एटीएम: राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये ४५ वॉटर एटीएमची स्थापना.
गावांचा कायापालट: मराठवाडा आणि विदर्भातील गावांसह राज्यातील २७१ गावांमध्ये जलसुरक्षा मजबूत केली.
शेतकऱ्यांना बळ: ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जलसंवर्धन आणि हवामान-सुसंगत शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण.
पर्यावरण संवर्धन: हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी ७ लाख वृक्षांची लागवड.
रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना
कौशल्य प्रशिक्षण: ६ हजार ५९८ युवकांना आधुनिक क्षेत्रांचे रोजगार प्रशिक्षण देण्यात आले, त्यापैकी ६३ टक्के युवकांना थेट रोजगार मिळाला.
भविष्यातील क्षेत्रे: इलेक्ट्रिक वाहने (EV), वाहन उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इलेक्ट्रॉनिक्स आणि बँकिंग अशा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या.
महिला सक्षमीकरण: रोजगार कार्यक्रमातील ६१ टक्के लाभार्थी महिला असून, ७५८ महिला सूक्ष्म उद्योजिकांना विशेष आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले. लाभार्थ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १.६६ लाख रुपये नोंदवले गेले आहे.
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया: बँकेच्या ‘सीईंग इज बिलिव्हिंग’ उपक्रमांतर्गत ४ लाख ३९ हजार ६८८ नागरिकांची नेत्र तपासणी झाली, तर ३८ हजार ६२५ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या.
स्वयंपूर्ण दृष्टी केंद्रे: राज्यभरात ४९ दृष्टी केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, ही केंद्रे शासकीय योजनांशी (आयुष्मान भारत) समन्वय साधून स्वयंपूर्ण पद्धतीने कार्यरत आहेत.
"वंचित आणि दुर्लक्षित समुदायांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. महाराष्ट्रातील जलसुरक्षा, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील उपक्रम ही आमच्या दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीची प्रभावी उदाहरणे आहेत."
– करुणा भाटिया (प्रमुख, शाश्वतता विभाग, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, भारत)
राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे हे उपक्रम शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनाला गती देणारे ठरत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या या कार्याचे विशेष कौतुक केले.