नाशिक विधान परिषद निवडणूक.. मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर बैठकांचे सत्र... मंत्री महाजन आणि सामंतांच्या मध्यस्थीला यश...

Share:
Main Image
Last updated: 11-Jun-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ११ जून - नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीत अखेर महायुतीसमोरील मोठा पेच सुटला आहे. निवडणूक लढवण्यावर ठाम राहिलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांची मनधरणी करण्यात महायुतीचे संकटमोचक संकट निवारक मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांना यश आले आहे. वरिष्ठ नेत्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर गोकुळ गिते यांनी आपला अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे. आठ दिवसांपासून नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या हायव्होल्टेज राजकीय नाट्यावर अखेर आज पडदा पडला. भाजप नेते गणेश गिते यांचे बंधू अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार थांबवत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तर मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गिते विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. 

उमेदवारीवरून पडली होती वादाची ठिणगी

महायुतीच्या जागावाटपात नाशिकची ही जागा शिवसेनेला (शिंदे गट) सोडण्यात आली होती. त्यानुसार पक्षाने विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. मात्र, या उमेदवारीवरून महायुतीमधील स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि वादाची ठिणगी पडली. पक्षादेश डावलून गणेश गिते, प्रसाद हिरे आणि गोकुळ गिते यांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

Advertisement

नेत्यांचे मनधरणीचे नाट्य आणि मुंबईचे बोलावणे

सुरुवातीला स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे गणेश गिते आणि प्रसाद हिरे यांनी आपले अर्ज मागे घेतले; परंतु गोकुळ गिते कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. गितेंच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यांच्या माघारीसाठी महायुतीचे ज्येष्ठ मंत्री गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते. दरम्यान, या प्रकरणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत गिते यांना मुंबईला बोलावून घेतले होते. 

आश्वासनानंतर बंड थंड!

मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिकमधील निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आणि गोकुळ गिते यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून भविष्यातील राजकीय पुनर्वसनाबाबत मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर गोकुळ गिते यांनी मवाळ भूमिका घेत माघार घेण्याची तयारी दर्शवली.

Advertisement

Comments

No comments yet.