नाशिक, (प्रतिनिधी) २१ मे - शहरात सध्या सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे रात्रीच्या वेळी दारे उघडी ठेवून झोपणाऱ्या नागरिकांना टार्गेट करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या अत्यंत अचूक तांत्रिक तपासामुळे पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या एका फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. दिंडोरी रोडवरील शाहूनगर झोपडपट्टी परिसरात संशयितांनी एकाच रात्रीत दोन घरांना लक्ष करत चोऱ्या केल्याचे समोर आले आहे.
उकाड्यामुळे दारे उघडी अन् भामट्यांचा डल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा राजू बोराडे (रा. शाहूनगर झोपडपट्टी, पाटाजवळ, दिंडोरी रोड, नाशिक) यांनी याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनीषा बोराडे आणि त्यांच्या शेजारी राहणारे अफजल सिकंदर सैय्यद यांचे कुटुंब बुधवारी (दि. २० मे) रात्रीच्या सुमारास असह्य उकाड्यामुळे आपल्या घराची दारे उघडी ठेवून झोपी गेले होते.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास दोन्ही कुटुंबे साखरझोपेत असताना, दबा धरून बसलेल्या दोन चोरट्यांनी उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश केला. त्यांनी सुरुवातीला अफजल सैय्यद यांच्या घरातून मोबाईल चोरला. त्यानंतर शेजारील बोराडे यांच्या घरात शिरून मनीषा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, घरातील पेटीत ठेवलेली १५०० रुपयांची रोकड आणि दोन महागडे मोबाईल, असा सुमारे २६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करून पळ काढला.
सकाळी जाग येताच उडाली खळबळ; सीसीटीव्हीने गेम केला!
सकाळी दोन्ही कुटुंबांना जाग आली असता, घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे शाहूनगर झोपडपट्टी परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.
पंचवटी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित आरोपी चोरी करताना आणि पळून जाताना कैद झाले होते. याच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून चेतन बाळू गायकवाड (वय २४, रा. देवी मंदिराजवळ, अवधूतवाडी, दिंडोरी रोड, नाशिक) याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यातील त्याचा दुसरा साथीदार फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास शिंदे करत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन: > सध्या उन्हाळ्यामुळे अनेक नागरिक रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे किंवा खिडक्या उघड्या ठेवून झोपतात. चोरटे याच संधीचा गैरफायदा घेतात, त्यामुळे नागरिकांनी रात्री झोपताना मुख्य सुरक्षा दरवाजा लॉक करावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.