नाशिक, (प्रतिनिधी) १६ मे - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने गोदाकाठच्या विकासकामांना बुलेट ट्रेनच्या वेगाने पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. रामकुंड आणि परिसर अधिक देखणा आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासन आजपासून म्हणजेच १६ मे ते १६ जुलै २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी या परिसरात तात्पुरते कडक निर्बंध लागू करत आहे. या काळात सामान्य नागरिक आणि भाविकांना घाटावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
कोणता परिसर राहणार बंद? (बाधित क्षेत्र):
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, होळकर पूल ते दुतोंड्या मारुती दरम्यानचा संपूर्ण घाट परिसर पुढील दोन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहील. या भागात सर्वसामान्य नागरिक, पर्यटक आणि वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
'अस्थी विसर्जन' विधीला सूट!
धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करत महापालिकेने या नियमात एक महत्त्वाची सवलत दिली आहे. रामकुंडावर केवळ 'अस्थी विसर्जन' आणि त्याशी संबंधित धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना या प्रतिबंधातून वगळण्यात आले असून, त्यांच्यासाठी प्रवेश सुरू राहील.
प्रशासकीय यंत्रणा काय म्हणते?
कुंभमेळ्याचा सविस्तर अंमलबजावणी आराखडा निश्चित झाल्यानंतर घाट सुधारणा, डागडुजी आणि सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे अत्यंत तातडीची आहेत. कामाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि संभाव्य अपघात रोखण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.
"आपल्या नाशिकला जागतिक स्तरावर भव्य आणि दिव्य स्वरूपात सादर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विकासकामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि भाविकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे."
— मनिषा खत्री (मनपा आयुक्त) व हिमगौरी आडके (महापौर)