पुणे, (प्रतिनिधी) ५ मे - महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेतील SRPF गट ५ (दौंड) येथील लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरून आता नवा वादंग निर्माण झाला आहे. या परीक्षेतील तब्बल ८५ टक्के प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे विचारण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
नुकत्याच पार पडलेल्या SRPF गट ५ च्या लेखी परीक्षेत १०० गुणांची प्रश्नपत्रिका विचारण्यात आली होती. मात्र, या प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका ठराविक खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील असल्याचे समोर आले आहे. पोलीस दलासारख्या शिस्तबद्ध आणि महत्त्वाच्या विभागाच्या परीक्षेत स्वतः तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नसंच तयार करणे अपेक्षित असताना, एका खासगी पुस्तकातून प्रश्न 'कॉपी-पेस्ट' केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशासकीय हलगर्जीपणा की 'मिलीभगत'?
रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत थेट प्रशासनावर निशाणा साधला आहे. त्यांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे प्रश्न:
प्रश्नांची चोरी की सेटिंग?: ८५ टक्के प्रश्न एकाच पुस्तकातून येणे हा केवळ योगायोग असू शकत नाही. यात एखादा जबाबदार अधिकारी आणि खासगी प्रकाशनाचे संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तज्ज्ञांचे काय झाले?: स्वतःचे प्रश्न संच तयार करण्यासाठी पोलीस दलाकडे तज्ज्ञ अधिकाऱ्यांची कमतरता आहे का?
विद्यार्थ्यांचे नुकसान: या परीक्षेस ३,९७७ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत, त्यांच्यावर हा अन्याय नाही का?
तातडीने चौकशीची मागणी
या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. "अहोरात्र मेहनत करणाऱ्या मुलांच्या स्वप्नांवर जर कोणी नांगर फिरवत असेल, तर त्या दोषींच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत," असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
"पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येत असून यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे."
— रोहिणी खडसे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार गट).
?s=20