पुणे (प्रतिनिधी) दि. २५ एप्रिल २०२६
राज्यात सध्या हवामानाचे विचित्र उलटफेर पाहायला मिळत आहेत. कुठे रणरणते ऊन, तर कुठे अचानक येणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा 'यलो अलर्ट': १२ जिल्ह्यांना तडाखा बसणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरासाठीही पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पावसासोबतच ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
एकिकडे पाऊस, दुसरीकडे उष्णतेचा तडाखा
राज्यात एका बाजूला पावसाची चिन्हे असताना दुसरीकडे विदर्भ आणि कोकणच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा कायम आहे. आर्द्रता वाढल्यामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली असून, नागरिकांची तारांबळ उडत आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
बळीराजा चिंतेत
ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. फळबागा विशेषतः आंबा आणि काजू पिकांचे यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
नागरिकांसाठी सूचना:
मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय घेऊ नका.
उष्णतेपासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या आणि दुपारी घराबाहेर पडणे टाळा.
शेतमालाची सुरक्षित साठवणूक करून ठेवावी.
?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2047591902233677929%7Ctwgr%5Eb2d9587153f6664bcf99350277e7562886ebc234%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F