त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) ८ एप्रिल - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविकांना उत्तम आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी नियोजित कामांना गती द्या. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ध्वजारोहणापूर्वी शहराचा कायापालट झाला पाहिजे, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत आज बुधवारी (दि. ८) आयोजित कुंभमेळा व विविध विभागांच्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा मंजू वारुंगसे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांचे पुनर्वसन अन् आरोग्य सुविधांवर भर
बैठकीत मंत्री भुसे म्हणाले की, कुंभमेळ्याच्या विकासकामांत बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांचे व दुकानदारांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभागाने १,३०० खाटांचे नियोजन केले असून, दर्शन पथ मार्गावरील शासकीय रुग्णालय देवस्थान ट्रस्टच्या कायमस्वरूपी जागेत उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महत्त्वाचे निर्णय व निर्देश:
पायाभूत सुविधा:* शहरातील मुख्य रस्त्यांचा विकास आणि वीजवाहिन्या (केबल्स) तातडीने भूमिगत कराव्यात.
शहर सुशोभीकरण:* भाविकांच्या स्वागतासाठी शहर सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.
सुरक्षा व्यवस्था:* गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त आणि संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी.
शिक्षण:* शहरात नवीन जिल्हा परिषद शाळा उभारण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
सिंहस्थ नियोजनाला 'राजकीय' वेग
पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकांचा धडाका लावला असून, मुख्यमंत्र्यांनीही आढावा घेतला आहे. त्यातच आता शिवसेनेचे मंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून त्र्यंबकेश्वरमध्ये बैठक घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे.
"सिंहस्थ कुंभमेळा ही केवळ धार्मिक पर्वणी नसून ती नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या विकासाची मोठी संधी आहे. ऑक्टोबरमधील ध्वजस्थापनेपूर्वी नियोजित कामांचा आराखडा प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसावा."
— दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री