नवी मुंबई, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - वापरून फेकून दिलेल्या कपड्यांच्या (Post-Consumer Textile Waste) व्यवस्थापनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने देशातील पहिले 'टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी' (TRF) केंद्र बेलापूर येथे कार्यान्वित केले आहे. या उपक्रमामुळे डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा कमी होण्यास मदत होत असून, शेकडो महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले आहे. 'टाकाऊतून टिकाऊ' बनवणाऱ्या या मॉडेलची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.
वार्षिक ७.८ दशलक्ष टन कचऱ्याचे आव्हान
भारतात दरवर्षी सुमारे ७.८ दशलक्ष मेट्रिक टन कापड कचरा निर्माण होतो. यामध्ये साड्या, गणवेश, डेनिम आणि घरातील जुन्या कापडांचा समावेश असतो. हा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने चक्राकार अर्थव्यवस्थेवर (Circular Economy) आधारित हे केंद्र सुरू केले आहे.
कसे चालते हे केंद्र?
महानगरपालिकेने शहरातील ८ विभागांमध्ये १४० हून अधिक 'टेक्सटाईल बीन्स' (कापड संकलन कुंड्या) बसवल्या आहेत. लवकरच ही संख्या २५० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. संकलित केलेले कापड बेलापूर येथील केंद्रात आणले जाते. तिथे 'कोशा' (KOSHA) या आधुनिक हँडहेल्ड स्कॅनरच्या सहाय्याने कापूस, पॉलिएस्टर, लोकर आणि रेशीम अशा तंतूंची ओळख पटवून वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण केले जाते.
महिलांच्या हाताला काम आणि सन्मान
या उपक्रमांतर्गत ३०० हून अधिक महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या १५० पेक्षा जास्त महिला जुन्या कापडापासून पिशव्या, चटया, कपडे आणि शोभेच्या वस्तू तयार करण्याचे काम करत आहेत. या कामातून महिलांना दरमहा ९,००० ते १५,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. गृहिणी आता या चक्राकार अर्थव्यवस्थेतील 'कुशल कारागीर' म्हणून समोर येत आहेत.
उपलब्धी आणि पुढील पाऊल:
* ३० मेट्रिक टन: आतापर्यंत संकलित झालेला कापड कचरा.
* ४१,००० हून अधिक: पुनर्प्रक्रिया केलेल्या वस्तू.
* १.१४ लाख: मोहिमेत सहभागी झालेली कुटुंबे.
* नवा प्रकल्प: बेलापूर येथील यशानंतर आता कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानाजवळ कायमस्वरूपी आणि अधिक क्षमतेचे केंद्र उभारले जाणार आहे.
नवी मुंबईचा हा उपक्रम 'स्वच्छ भारत २.०' आणि शाश्वत विकास ध्येयांना (SDG) अनुसरून असून, कचरा व्यवस्थापनात शहराने पुन्हा एकदा देशासमोर आदर्श निर्माण केला आहे.