नाशिक, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आता कंबर कसण्यात आली आहे. विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक आणि शेतकरी यांच्यासाठी असलेल्या या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत 'लक्षित गट परिवार सर्वेक्षण' मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
काय आहे अभियानाचा उद्देश?
अमृत संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचाव्यात, हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत अमृत संस्थेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांच्या माध्यमातून समाजाची सांख्यिकी माहिती संकलित करणार आहेत.
या जातींचा सर्वेक्षणात समावेश:
या सर्वेक्षणात प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, मारवाडी, गुजराथी, पटेल, राजपूत, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी आणि कोमटी/वैश्य यांसह इतर नमूद जातींचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
नाशिकचे विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे की, लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. जेणेकरून भविष्यातील योजनांचे नियोजन करणे सुलभ होईल.
संपर्क आणि मदत केंद्र:
नागरिकांना अधिक माहितीसाठी 'अमृत'च्या टिळकवाडी येथील जिल्हा कार्यालयात किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल:
जिल्हा कार्यालय: ९१२२२८७७०
संजय गोसावी (सिन्नर, दिंडोरी, निफाड व इतर तालुके): ८८५७०७७३९११
मयूर हातवळणे (नाशिक शहर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर): ८८३००४६२५६
अजिंक्य कन्नल (मालेगाव, नांदगाव, येवला): ९६६५६९२६७६
संकेतस्थळ: https://mahaamrut.org.in