येवला, (प्रतिनिधी) ३१ मार्च - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला अखेर उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या चारीला उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे गवंडगाव व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आज या चारीला पाणी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला उन्हाळी आवर्तन मिळावे या पार्श्वभूमीवर गावंडगाव व परिसरातील नागरिकांनी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन ही समस्या मांडली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार समीर भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच या विभागाच्या कार्यकारी अभियंता श्री. भागवत यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. परिणामी आज अखेर पालखेड कॅनॉलमधून या चारीमध्ये पाणी सोडण्यात आले असून, गावंडगाव व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण क्षणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते पालखेड कॅनॉल येथे जलपूजन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने गावकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
उन्हाळी आवर्तन सुरू झाल्यामुळे गवंडगावसह परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ तसेच प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला अनेक दिवसांपासून उन्हाळी आवर्तन बंद होते. शेतकऱ्यांच्या मागणी नंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आज उन्हाळी आवर्तन सुरू झाल्यामुळे गवंडगावसह तालुक्यातील पूर्व भाग परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
-माजी खासदार समीर भुजबळ