मुंबई, (प्रतिनिधी) २६ मार्च - नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा 108 (टोल फ्री क्रमांक) रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. मात्र, याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने यामध्ये त्रुटी दूर करून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच 1737 नवीन 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे विधानसभेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेबाबत सदस्य गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर दिले.
मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले,108 रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. ही संपूर्ण सेवा करार आणि सामंजस्य करार पद्धतीने एजन्सीद्वारे चालवली जाते. संबंधित एजन्सींनी किमान वेतन कायद्याचे पालन करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देणे बंधनकारक आहे. याबाबतीत कुठलीही त्रुटी आढळल्यास शासनाकडून कारवाई केली जाईल, या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने 108 रुग्णवाहिका सेवेसाठी चौकशी समिती नेमली आहे. या समितीद्वारे सेवेमधील त्रुटी दूर करून कामकाज अधिक गतिमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य शरद सोनावणे, राजेश पवार,भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित करुन चर्चेत सहभाग घेतला.