नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २६ मार्च - देशातील एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या कालमर्यादेत (Booking Time Limit) बदल करण्यात आल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारने या सर्व बातम्यांचे खंडन केले असून बुकिंगच्या नियमांत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये आणि घाबरून जाऊन अनावश्यक बुकिंग करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.
काय पसरवली जात होती अफवा?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये अशी माहिती पसरवली जात होती की, उज्ज्वला योजनेच्या (PMUY) ग्राहकांसाठी ४५ दिवस, तर बिगर-उज्ज्वला एकल सिलिंडरसाठी २५ दिवस आणि दुहेरी सिलिंडर जोडणीसाठी ३५ दिवसांची कालमर्यादा निश्चित केली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
सद्यस्थितीतील नियम काय?
सरकारने स्पष्ट केले आहे की, रिफिल बुकिंगची कालमर्यादा पूर्वीप्रमाणेच असून ती खालीलप्रमाणे निश्चित आहे:
शहरी भाग: कोणत्याही प्रकारची जोडणी (Connection) असली तरी बुकिंगसाठी २५ दिवसांची मर्यादा.
ग्रामीण भाग: कोणत्याही प्रकारची जोडणी असली तरी बुकिंगसाठी ४५ दिवसांची मर्यादा.
यामध्ये जोडणीचा प्रकार (PMUY किंवा Non-PMUY) विचारात न घेता हीच कालमर्यादा लागू राहील.
पुरेसा साठा उपलब्ध
देशात एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे सरकारने पुनरुच्चारले आहे. चुकीची माहिती प्रसारित करू नका आणि केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवा, अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.