भोंदूबाबा खरातच्या कारनाम्यावरून राज ठाकरेंचा तीव्र संताप...

Share:
Main Image
Last updated: 23-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ मार्च - अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणातील हिडीस तपशील समोर आल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. "ज्या महाराष्ट्राला संतांची आणि विचारांची थोर परंपरा लाभली, तिथे राजकारण्यांच्या आशीर्वादाने खरातसारखा नीच माणूस धुमाकूळ घालतो, हे पाहून डोकं गरगरल्यासारखं होतंय," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, या प्रकरणाचा वापर केवळ राजकीय विरोधकांचे पंख छाटण्यासाठी करू नका, तर गुन्हेगारांना कठोर शासन करा, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिला आहे.

महाराष्ट्राच्या अध:पतनावर बोट
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, "आम्ही महाराष्ट्राची सशक्त परंपरा आणि अद्वितीय माणसांचे दर्शन तरुण पिढीला घडवले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबांपासून ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत सर्वांनी मराठी मनाची मशागत केली. मात्र, आजचे राजकारण केवळ पद, सत्ता आणि मंत्रिपदाच्या धडपडीत अडकले आहे. सत्ता टिकवण्यासाठी नेते तर्काला तिलांजली देऊन अशा भोंदू बाबांच्या भजनी लागतात, हे भीषण आहे."

२०१३ च्या कायद्याचा विसर पडला का?
डिसेंबर २०१३ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत 'अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक' पारित झाले होते. याचा आठवण करून देत राज ठाकरेंनी लोकप्रतिनिधींना आरसा दाखवला. "हे विधेयक ज्या आमदारांनी मंजूर केले, त्यातीलच अनेक जण आज खरातच्या प्रकरणात अडकले असतील, हा दुर्दैवी विरोधाभास आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली स्त्रियांचे शोषण होत असताना लोकप्रतिनिधींचा कोडगेपणा संतापजनक आहे," असे त्यांनी नमूद केले.
'धोबीपछाड' राजकारण थांबवा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'हे प्रकरण आम्हीच शोधून काढले' असे म्हटल्याचा संदर्भ घेत राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. "जर हे प्रकरण तुम्ही शोधले, तर इतके दिवस तुमच्याच घटक पक्षातील नेत्यांच्या नावाभोवती संशयाची सुई असताना तुम्हाला सुगावा का लागला नाही? हे प्रकरण कोणाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा चिरडण्यासाठी तर वापरले जात नाही ना? एकदा समोरच्याने शरणागती पत्करली की हे प्रकरण बासनात गुंडाळले जाईल का?" असे रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केले.

Advertisement

माध्यमांना आणि जनतेला आवाहन
राज ठाकरे यांनी माध्यमांना विनंती केली की, त्यांनी या 'धोबीपछाड' राजकारणाचा भाग न होता, अशा बुवाबाजांचा आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या राजकारण्यांचा पर्दाफाश करावा. तसेच जनतेला आवाहन करताना ते म्हणाले, "गावागावांत कीर्तनं आणि ज्ञानेश्वरीचं पठण होणाऱ्या या राज्यात जर तुम्ही अशा नाठाळ नेत्यांना निवडून देणार असाल, तर महाराष्ट्राचं काही खरं नाही."

'तरच छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार'
राज्यात वाढती ड्रग्ज विक्री, मुलींचे अपहरण आणि स्त्रियांच्या शोषणाच्या घटनांवरून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला. "मुख्यमंत्री महोदय, हे राजकारण बाजूला ठेवा आणि या प्रकरणाचा छडा लावून दोषींना ठेचून काढा. तर आणि तरच तुम्हाला भाषणांमध्ये संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे," अशा जळजळीत शब्दांत त्यांनी पत्राचा समारोप केला आहे.

महत्त्वाचे मुद्दे:
राजकीय वरदहस्त: खरात प्रकरणातील राजकीय कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची मागणी.
प्रशासनावर टीका: मंत्र्यांचे सल्लागार बनलेल्या आणि सत्तेला चिकटून राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
सामाजिक आवाहन: तरुण पिढीने महाराष्ट्राचा खरा इतिहास आणि विवेकाचा मार्ग विसरू नये.

Comments

No comments yet.