नगर जिल्ह्यातील रेल्वे भूसंपादनाबाबत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 14-Mar-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) १४ मार्च - राहुरी - शनिशिंगणापूर तसेच पुणतांबा - शिर्डी रेल्वे मार्गांसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील निर्णय घ्यावेत, असे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ​जिल्ह्यातील विविध रेल्वे मार्गांच्या प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह पुणतांबा, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकरी तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

​पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गासंदर्भात डॉ. विखे पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद होणार नाही, याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यामुळेच रेल्वे प्रकल्प मार्गी लागला. त्यामुळे आता त्यांच्यावर अन्याय करणे उचित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात यावेत. शेतकऱ्यांचे सायपन अधिकृत करणे, अंडरपास मंजूर करणे व पुणतांबा-शिर्डी मार्गावरील गाड्यांना पुणतांबा जंक्शनवर थांबा देणे, या मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

​राहुरी-शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी काही गावांमधील जमिनीच्या संपादन प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. भूसंपादनामुळे काही भागांत जमिनीची विभागणी होत आहे. यापूर्वी विद्यापीठ व मुळा धरणासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. आता रेल्वे प्रकल्पासाठी अधिक भूसंपादन झाल्यास शेतकरी भूमिहीन होतील, अशी बाब उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी घाईने निर्णय न घेता शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेऊनच पुढील कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिल्या.

Comments

No comments yet.