नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १२ मार्च - संसदेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी आहे, मात्र ते संविधान आणि संसदीय कार्यपद्धतीचे नियमन करणारे नियम आणि स्थायी आदेशांच्या अधीन आहे, यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज भर दिला. ते म्हणाले की, सभागृहात बोलताना सदस्यांनी कसे वागावे याबद्दलच्या नियमांतर्गत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आहेत.
संसदेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात घटनेच्या कलम 105 मध्ये दिलेल्या संदर्भाबाबत अध्यक्षांनी स्पष्ट केले की, संविधान स्वतःच हे स्वातंत्र्य संसदीय नियमांच्या चौकटीत ठेवते. आपल्याला पदावरून हटवण्याच्या ठरावावरील चर्चेच्या समाप्तीनंतर एक दिवसानंतर सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत सभागृहात बारा तासांहून अधिक काळ चर्चा झाली, या दरम्यान विविध पक्षांच्या सदस्यांनी आपली मते, युक्तिवाद आणि चिंता व्यक्त केल्या.
चर्चेदरम्यान,बोलण्याच्या संधींबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना, सभापतींनी स्पष्ट केले की सर्व सदस्यांनी सभागृहाच्या नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियांचे पालन केले पाहिजे. “काही सदस्यांचा असा विश्वास आहे की विरोधी पक्षनेता कधीही उभे राहू शकतो आणि आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयावर विशेषाधिकार म्हणून बोलू शकतो. मी हे स्पष्ट करू इच्छितो की सभागृहाने स्वतःच तयार केलेल्या नियमांनुसार ते काम करते. हे नियम प्रत्येक सदस्याला एक समान लागू होतात,” त्यांनी अधोरेखित केले."या सभागृहातील कोणत्याही सन्माननीय सदस्याला या नियमांच्या चौकटीबाहेर बोलण्याचा विशेषाधिकार नाही," त्यांनी नमूद केले.
विरोधी पक्षांच्या सदस्यांचे माईक बंद करण्यासंदर्भातल्या आरोपावरही त्यांनी उत्तर दिले. “मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की अध्यक्षांकडे मायक्रोफोन चालू अथवा बंद करण्यासाठी कोणतेही बटण नाही. सभागृहातील यंत्रणा केवळ ज्या सदस्याला बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्याचा मायक्रोफोन सक्रिय करते,” त्यांनी स्पष्ट केले.
सभापतींनी अधोरेखित केले की "ही खुर्ची कोणत्याही व्यक्तीची नाही. ती भारताच्या लोकशाही परंपरांचे, संविधानाच्या आत्म्याचे आणि या महान संस्थेच्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे.”
महिला सदस्यांच्या आदराबाबत व्यक्त केलेल्या चिंतेचा उल्लेख करताना सभापतींनी सर्व महिला खासदारांबद्दलचा त्यांचा आदर पुन्हा व्यक्त केला. "माझ्या कार्यकाळात प्रत्येक महिला सदस्याला - पहिल्यांदाच आलेल्या सदस्यांसह - त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे," असे ते म्हणाले.
विरोधी सदस्यांना चर्चेत पुरेशी संधी दिली गेली नाही, या दाव्याचेही सभापतींनी खंडन केले.
सभागृहात गदारोळ करण्याच्या वर्तनावर सभापतींनी कडक टीका केली आणि म्हटले की घोषणाबाजी करणे, फलक दाखवणे, कागदपत्रे फाडणे आणि सभागृहाच्या हौद्याकडे जाणे हे प्रस्थापित संसदीय परंपरेच्या विरुद्ध आहे. "या कृतींमुळे केवळ सभागृहाचे कामकाजच विस्कळीत होत नाही तर त्याची प्रतिष्ठाही कमी होते," असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी संसद सदस्यांना संसदीय लोकशाहीच्या सर्वोच्च परंपरा जपण्याचे आवाहन केले.
सभापतींनी पुढे यावर भर दिला की, संसदेची प्रतिष्ठा आणि शिस्त जपणे ही सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी आहे.
आपल्या भाषणाचा समारोप करताना बिर्ला यांनी सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन केले की, संसदेला अधिक बळकट करण्यासाठी तसेच लोकांचा विश्वास कायम राखण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे कार्य करावे.
?s=20