युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे का? 

Share:
Main Image
Last updated: 09-Mar-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ९ मार्च - जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यामध्ये नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकामार्फत अचानक तपासणी करावी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएल कंपनीचे राजकुमार मिश्रा यांच्यासह संबंधित गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी व गॅस वितरक उपस्थित होते.

Advertisement

सध्या जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. नियमानुसार गॅस वितरण होत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच, गॅसची ऑनलाईन नोंदणी करून अधिकृत पुरवठाधारकांकडूनच गॅस उपलब्ध करून घ्यावा. गॅस वितरणासंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन १८००२२४३४४, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  १८००-२३३३-५५५, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड १८००-२३३३-५५५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील  आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी केले. 

गॅस एजन्सींनी गॅस सिलिंडरचा पुरवठा वेळेत व नियमानुसार करावा. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, तसेच ग्राहकांना वेळेत सेवा मिळेल यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वितरण करावे. प्रशासनाने गॅस पुरवठा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.

Comments

No comments yet.