राजकीय भूकंप... नितीश कुमारांची बिहारच्या राजकारणातून 'एक्झिट'... कोण होणार मुख्यमंत्री?

Share:
Main Image
Last updated: 05-Mar-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ५ मार्च - बिहारच्या राजकारणात आज एका मोठ्या युगाचा अंत झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि 'सुशासन बाबू' म्हणून ओळखले जाणारे नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून दिल्लीच्या दिशेने प्रयाण करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यामुळे बिहारमध्ये आता नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, बिहारच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

'दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा'
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी म्हटले की, "गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बिहारच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. माझ्या संसदीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच माझी एक इच्छा होती की, मी बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्य असावे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे."

Advertisement

अमित शहांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
नितीश कुमार यांनी आज पाटणा येथे विधानसभा सचिवांकडे आपला उमेदवारी अर्ज सोपवला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि एनडीएचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. नितीश कुमार यांच्यासोबतच भाजपचे नितीन नबीन आणि जेडीयूचे रामनाथ ठाकूर यांनीही राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री?
नितीश कुमार केंद्रात जाणार असल्याचे स्पष्ट होताच बिहारमध्ये सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात आता भाजपच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होईल.
भाजपचा मुख्यमंत्री: बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होण्याची शक्यता आहे.
निशांत कुमार यांची एन्ट्री: नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार हे सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असून, त्यांना नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एक पर्वाचा शेवट
नितीश कुमार यांनी तब्बल १० वेळा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. प्रदीर्घ काळ बिहारच्या राजकारणाचे केंद्रस्थान राहिलेले नितीश कुमार आता दिल्लीत गेल्यामुळे जेडीयू (JD-U) पक्षामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. "नवीन सरकारला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन राहील," असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Comments

No comments yet.