या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे २३ फेब्रुवारीपासून आवर्तन... हजारो शेतकऱ्यांना लाभ...

Share:
Main Image
Last updated: 21-Feb-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - मुळा लाभक्षेत्रातील उजव्या व डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन, रब्बी हंगाम-२ साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

​सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्यामुळे शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मोठी मागणी होत होती. या संदर्भात आ. मोनिकाताई राजळे व आ. विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन, रब्बी पिकांची व पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेत आवर्तन सुरू करण्याची विनंती केली होती. यावर तातडीने कार्यवाही करत, पालकमंत्री विखे पाटील यांनी धरणातील पाण्याचा उपलब्ध साठा तसेच भविष्यातील पाण्याचे नियोजन विचारात घेऊन आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

​या निर्णयाचा उजव्या कालव्यावरील राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सदर आवर्तन ४५ दिवसांचे असणार असून, त्यासाठी धरणातील ५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. या आवर्तनाचा लाभ अंदाजे २७ हजार हेक्टर क्षेत्राला होईल.

​तसेच, मुळा डाव्या कालव्यासाठी ४५० एमसीएफटी इतका पाणीसाठा राखीव असून हे आवर्तन २१ दिवस चालणार आहे. याचा फायदा अंदाजे २५०० हेक्टर इतक्या क्षेत्राला होईल. आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अजिबात अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे, तसेच शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचेल असे अचूक नियोजन करण्याचे काटेकोर निर्देश मंत्री पालकमंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.