मुंबई, (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक गंभीर शंका निर्माण झाल्या असून, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू आणि 'डीजीसीए'ला (DGCA) सविस्तर सादरीकरणासह (Presentation) ई-मेल पाठवून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती केली आहे.
यंत्रणांनी वेळ नाकारल्याचा आरोप
रोहित पवार यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताबाबतचे तांत्रिक मुद्दे आणि काही संशयास्पद तथ्ये मांडली होती. या विषयावर प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शहा, नागरी उड्डाणमंत्री आणि डीजीसीएची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही भेट होऊ शकली नाही. "गृहमंत्री आणि उड्डाणमंत्री अधिवेशनात व्यस्त असल्याने वेळ मिळाला नसेल, पण डीजीसीएने वेळ का दिला नाही, हे समजले नाही," असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
ई-मेलद्वारे धाडले पुरावे
भेट न झाल्याने रोहित पवार यांनी आता डिजिटल माध्यमातून आपला पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांनी या अपघाताशी संबंधित सर्व शंका आणि माहितीचे प्रेझेंटेशन तयार करून संबंधित खात्यांना ई-मेल केले आहे. या अपघाताची वस्तुनिष्ठ उकल व्हावी आणि महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
तपासाच्या गतीवर नाराजी
पत्रकार परिषदेनंतर तपासाला काही प्रमाणात सुरुवात झाली असली, तरी तो अपेक्षित वेगाने होत नसल्याची खंत रोहित पवार यांनी बोलून दाखवली. "आम्ही सत्तेत नसलो तरी आमच्या पद्धतीने पाठपुरावा करत आहोत. आता राज्य सरकारने आणि सत्तेतील सर्वच जबाबदार व्यक्तींनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पाठपुरावा करावा," असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महत्वाचे मुद्दे:
सखोल चौकशीची मागणी: अपघातामागील तांत्रिक बिघाड की घातपात? याची स्पष्टता व्हावी.
केंद्रीय स्तरावर पाठपुरावा: गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA कडे धाव.
डिजिटल प्रेझेंटेशन: पुराव्यांसह सर्व शंका ई-मेलद्वारे यंत्रणांकडे सुपूर्द.
रोहित पवार काय म्हणाले?
"अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका आहेत. यंत्रणांनी वेळ दिला नसला तरी सर्व माहिती त्यांच्याकडे पाठवली आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची वस्तुनिष्ठ उकल होईल, असा विश्वास आहे."
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar