'वहिनी, सावध असा...' अजितदादांच्या निधनानंतर सुषमा अंधारेंचे सुनेत्रा पवारांना भावनिक पण परखड पत्र...

Share:
Main Image
Last updated: 31-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३१ जानेवारी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत असतानाच, त्यांच्या राजकीय वारसाहक्कावरून सुरू झालेल्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना एक अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या सूचक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत, सुनेत्रा वहिनींना आगामी आव्हानांबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

'तो' प्रसंग आणि काळजाला भिडलेले सांत्वन
सुषमा अंधारे यांनी पत्राची सुरुवात दादांच्या निधनानंतरच्या त्या भीषण प्रसंगाने केली. अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील तो स्तब्ध करणारा माहोल आणि पार्थ पवार यांची हतबलता त्यांनी शब्दात मांडली. "शांत, सुन्न आणि बधिर अवस्थेत तुम्ही प्रत्येकाला भेटत होतात, पण जेव्हा मी तुमच्या जवळ गेले आणि तुमच्या मांडीवर डोकं ठेवून रडले, तेव्हा तुमची ती आपुलकीची हाक काळजाला स्पर्श करून गेली," अशा भावना अंधारे यांनी व्यक्त केल्या.

राजकीय घाई आणि 'गिधाडांची वक्रदृष्टी'
अजितदादांच्या निधनाला ४८ तास उलटायच्या आतच त्यांच्या राजकीय वारसदाराची चर्चा सुरू झाल्याबद्दल अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याला 'अमानवी आणि क्रूर' म्हटले आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून होत असलेला शपथविधी हा भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला तरी तो 'गरजेचा' असल्याचे त्यांनी समर्थनही केले आहे.
"दादांनी स्वकर्तृत्वाने जे अफाट साम्राज्य उभं केलं, त्यावर कुठल्याही गिधाडांची वक्रदृष्टी पडू नये म्हणून तुम्हाला हे पाऊल उचलणे गरजेचेच आहे," असे अंधारे यांनी पत्रात नमूद केले.

अहिल्यादेवी होळकरांचा दाखला आणि सावधगिरीचा इशारा
पत्रात त्यांनी माळव्याच्या राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांचे उदाहरण दिले आहे. पती खंडेराव होळकरांच्या मृत्यूनंतर साम्राज्य वाचवण्यासाठी अहिल्यादेवींनी ज्याप्रमाणे कंबर कसली, तशीच परिस्थिती आज सुनेत्रा वहिनींसमोर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पत्राच्या शेवटी त्यांनी सत्ताधारी गोटातल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. "वहिनी सावध असा... प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांसारख्या प्रवृत्ती तुम्हाला 'गुंगी गुडिया' समजून मनमानी करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही दादांच्या तालमीत तयार झाला आहात, हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे," असा थेट इशारा त्यांनी दिला.

विरोधक म्हणून साथ आणि इशाराही
"आम्ही दादांचे राजकीय विरोधक आहोत आणि भविष्यातही प्रश्न विचारत राहू. पण महिला म्हणून जर कोणी तुमची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला, तर भगिनीभाव जपत आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू," अशी ग्वाही देत अंधारे यांनी पत्राचा शेवट केला आहे.

अजितदादांच्या निधनानंतर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव वेगाने सुरू असताना, सुषमा अंधारे यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.