आदिवासींचा लाँग मार्च मुंबईत धडकण्यापूर्वीच हालचाली वाढल्या.. राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 27-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ जानेवारी - माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वात दिनांक २५ जानेवारी रोजी नाशिकहून सुरू झालेला हजारो शेतकऱ्यांचा भव्य लाँग मार्चने, गेल्या दोन दिवसांत जवळपास ६० किलोमीटरचे अंतर पार करून, आज  सकाळी निसर्गरम्य कसारा घाटातून खाली उतरण्यास सुरुवात केली. हा मार्च आज नाशिक जिल्हा सोडून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करेल. गरीब आदिवासी, शेतकरी, महिला आणि पुरुषांनी दाखवलेला कणखरपणा खरोखरच कौतुकास्पद आहे.

आज या मोर्चात पालघरच्या मोर्चाचे नेते - आमदार विनोद निकोले, किरण गहाला, रडका कलंगडा, चंद्रकांत घोरखाना आणि ठाणे-पालघर जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ आणि इतर नेते व कार्यकर्ते सामील झाले.

मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सोशल मीडियामध्ये या मोर्चाला मिळत असलेल्या व्यापक प्रसिद्धीमुळे धास्तावलेल्या राज्य सरकारने आज मुंबईत मंत्रालयात चर्चेसाठी एका शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि इतर संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

या शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, उमेश देशमुख, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, इरफान शेख, किरण गहला, सुनील मालुसरे, भिका राठोड, देवीदास वाघ, रामदास पवार, रडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाना, एकनाथ मेंगाळ इत्यादींचा समावेश आहे.

Advertisement

Comments

No comments yet.