४० बचत गट महिलांना १ कोटी ४० लाखांचे अर्थसहाय्याचे वाटप...

Share:
Main Image
Last updated: 26-Jan-2026

येवला, (प्रतिनिधी) २६ जानेवारी - महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार केवळ शब्दांत मांडला नाही, तर तो कृतीतून जगला. त्या काळात विधवा स्त्रियांवर अन्याय, अपमान आणि सामाजिक बहिष्कार लादला जात असताना, महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा निर्भीडपणे पुरस्कार केला, तर सावित्रीबाई फुले यांनी एकल व वंचित महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचले. पुण्यात त्यांनी विधवांसाठी आश्रय, शिक्षण आणि संरक्षणाची व्यवस्था उभी केली. समाजाने नाकारलेल्या एकल महिलांना फुले दांपत्याने माणूस म्हणून मान दिला. आज आपण एकल महिलांच्या सन्मान, हळदी-कुंकू आणि शासकीय सहाय्याच्या कार्यक्रमांद्वारे जे करत आहोत, त्याची बीजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतच रोवलेली आहेत. त्यामुळे एकल महिलांचा सन्मान म्हणजे फक्त सामाजिक उपक्रम नाही, तर फुले दांपत्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आहे, असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले.

येवला माऊली लॉन्स येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान एकल महिला रोजगार प्रशिक्षण अर्थसहाय्य वितरण व हळदी कुंकू कार्यक्रम मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते एकल महिला रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून ४० बचत गटाच्या महिलांना १ कोटी ४० लाखांचे अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनराध्यक्षा पुष्पा गायकवाड, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार, नगरसेवक दीपक लोणारी, संतोष खैरनार, दीपक गायकवाड, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सविता धनवटे, उज्ज्वला पैठणकर, तालुका अभियान व्यवस्थापक डी.एच.जैन यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व एकल महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, एकल महिलांना एकत्र आणून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासोबत त्यांना सक्षम करून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून हा हळदी कुंकू उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना अधिक सक्षम होण्यासाठी बचतगट हे अतिशय महत्वाचे साधन आहे. त्यामुळे अधिक अधिक बचतगट निर्माण करून शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेऊन अधिक सक्षम झाले पाहिजे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आपण शासनाच्या विविध योजनांचा लाभ या महिलांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.    भविष्यात एकल महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अधिक संधी, कौशल्य प्रशिक्षणाचे स्वतंत्र कार्यक्रम, मुलांच्या शिक्षणासाठी विशेष मदत, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहे.     

त्या पुढे म्हणाले की, एकल महिला म्हणजे समाजाच्या कडेला उभा असलेला घटक नाही, तर समाजाला पुढे नेणारी मौन शक्ती आहे. पतीच्या निधनानंतर, घटस्फोटानंतर किंवा कौटुंबिक आधार हरवल्यानंतरही जी स्त्री आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेलते, मुलांचे शिक्षण, घराचा संसार आणि समाजातील आव्हाने यांना एकटीने सामोरी जाते तीच खरी एकल महिला आहे. अशा महिलांना दुर्बल समजण्याची मानसिकता आजही समाजात आढळते; मात्र आजचा हा कार्यक्रम त्या मानसिकतेला ठामपणे आव्हान देतो असे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, हळदी-कुंकू हा आपल्या संस्कृतीतील सन्मानाचा, सौभाग्याचा आणि स्त्रीत्वाचा प्रतीक आहे. परंतु दुर्दैवाने, एकल महिलांना या परंपरेपासून अनेकदा दूर ठेवण्यात आले. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन आणि समाज एकत्र येऊन स्पष्ट संदेश देत आहेत की, एकल महिला कोणत्याही सण-समारंभात दुय्यम नाहीत. त्यांनाही समान सन्मान, समान अधिकार आणि समान सहभागाचा हक्क आहे.  समाजाने एकल महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलावी, त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे तर सन्मानाने पाहावे, हा या उपक्रमाचा खरा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे म्हणाले की, महिलांना केवळ आर्थिक मदत देऊन महिला सक्षम होणार नाही. त्यासाठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणे आवश्यक आहे. येवला हे पैठणीचे माहेरघर आहे. या पैठणी व्यवसायात बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येईल निर्मिती आणि विक्री या दोन्ही गोष्टी यातून होऊ शकणार आहे. बचतगट अधिक सक्षम करण्यासाठी महिलांनी विविध व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. शासन आपल्या पूर्णपणे पाठीशी असून या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सन्मानाने समाजात पुढे याल असे त्यांनी सांगितले.


यावेळी तहसीलदार आबा महाजन म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रेरणेतून विधवा महिलांसाठी अतिशय महत्वाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. डॉ.शेफाली भुजबळ यांच्या माध्यमातून मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात येत असून हा अतिशय आदर्श उपक्रम त्यांनी दरवर्षी राबवावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच एकल महिलांना शासकीय कार्यालयात कुठल्याही अडचणी येत असतील तर त्यांनी तात्काळ संपर्क साधावा. महिलांना प्रशासनाच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल कुठल्याही योजनेपासून या महिला वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी प्रास्ताविक केले.

एकल महिला या आपल्या कुटुंबातील एक  महत्त्वाचा भाग - मंत्री छगन भुजबळ

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित महिलांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एकल महिलांना समाजात वावरत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. समाजात त्यांना सन्मानाने जगता यावे ही सर्व समाजाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने शासनाच्या माध्यमातून एकल महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. लाडकी बहीण, लखपती दीदी यासह अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे. त्यांना समाजात सक्षमपणे उभे करू न सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी एकल महिलाना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचले. आजही समाजात काही प्रमाणात आपल्याला या महिलांना समाजात वावरत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिला या आपल्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. या एकल महिलांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Comments

No comments yet.