रेल्वेचा महाराष्ट्राला मोठा दिलासा.. या मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी...

Share:
Main Image
Last updated: 18-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १८ जुलै - महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला आणि मालवाहतूक क्षमतेला मोठी गती देणारा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. राज्यातील महत्त्वाच्या अशा ताडाळी ते घुग्गुस दरम्यानच्या १४ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण (Doubling) प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे या भागातील आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. देशातील रेल्वेजाळ्याचा विस्तार आणि क्षमता वाढवण्यासाठी रेल्वेने दुपदरीकरण, तिपदरीकरण, उड्डाणपूल आणि बायपास अशा कामांची व्यापक कार्ययोजना आखली आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

दिल्ली-चेन्नई मुख्य रेल्वेमार्गाला होणार फायदा
ताडाळी-घुग्गुस हा विभाग सध्या वर्धा-बल्लारशाह मार्गावरील एकेरी रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग देशातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या अशा दिल्ली-चेन्नई मुख्य रेल्वे मार्गिकेचा (Route) एक भाग आहे. या १४ किलोमीटरच्या टप्प्याचे दुपदरीकरण झाल्यामुळे या संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि कार्यक्षम होईल, तसेच मुख्य मार्गावरील गाड्यांचा खोळंबा कमी होण्यास मदत होईल.

प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:
अतिरिक्त मालवाहतूक क्षमता: प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून दरवर्षी ४.५ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक हाताळणे शक्य होणार आहे.
औद्योगिक क्षेत्राला मोठा बुस्ट: हा पट्टा मुख्यत्वे मालवाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. दुपदरीकरणामुळे कोळसा, लोहखनिज, जिप्सम, पेट्रोलियम उत्पादने (POL), वाळू आणि लॅटराइट राख यांसारख्या कच्च्या मालाची वाहतूक जलद गतीने होईल.
आर्थिक विकासाला गती: या वाहतूक क्षमतेतील वाढीमुळे स्थानिक उद्योग आणि खाण क्षेत्राला मोठा फायदा होऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
क्षमता वृद्धी आणि देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गिका अधिक मजबूत करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने टाकलेले हे एक ठोस पाऊल मानले जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.