मनोहर शिंदे, (नाशिक) १६ जुलै - "उद्योजक हा देशाच्या आर्थिक विकासाचा मुख्य कणा असून, उद्योगांना सुरक्षित आणि भयरहित वातावरण उपलब्ध करून देणे हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. उद्योग क्षेत्राशी संबंधित सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची दरमहा प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन समन्वय बैठक आयोजित करण्यात येईल," असे महत्त्वपूर्ण आश्वासन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी 'निमा'चे अध्यक्ष आशिष नहार यांच्या हस्ते डॉ. स्वामी यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दिंडोरी अन् सिन्नर एमआयडीसीत पोलीस गस्त वाढवणार
संवाद बैठकीत सिन्नर व दिंडोरी एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सुरक्षा, महिला कामगारांची सुरक्षा, सायबर गुन्हे, आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था यावर सविस्तर चर्चा झाली. डॉ. स्वामी यांनी सांगितले की, एमआयडीसी परिसरातील चोऱ्या, अवैध दारू विक्री, टपऱ्यांवरील गैरप्रकार आणि इतर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस गस्त (पेट्रोलिंग) अधिक प्रभावी केली जाईल. तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नियमित 'स्पॉट तपासणी' करण्याच्या कडक सूचना दिल्या जातील.
महिला सुरक्षेसाठी 'POSH' समिती बंधनकारक; दामिनी पथके तैनात
महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करत डॉ. स्वामी यांनी स्पष्ट केले की, १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक औद्योगिक संस्थेत 'POSH' (कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण) कायद्यांतर्गत तक्रार समिती असणे बंधनकारक आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात 'भरोसा सेंटर' व 'दामिनी पथके' पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत नियमित पेट्रोलिंग आणि समुपदेशन सुरू असून शाळा, आश्रमशाळा तसेच स्कूल बसच्या सुरक्षेवरही विशेष लक्ष दिले जात आहे.
सीसीटीव्ही नेटवर्क आणि ११२ हेल्पलाईनवर भर
औद्योगिक परिसरातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी डॉ. स्वामी यांनी उद्योजकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या:
सीसीटीव्ही कंट्रोल रूम: सर्व उद्योजकांनी एकत्रितपणे संपूर्ण एमआयडीसी परिसर व्यापेल अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारावे आणि त्याची एक एकत्रित कंट्रोल रूम तयार करावी.
सुरक्षा रक्षकांची पडताळणी: उद्योगांनी नियुक्त केलेले सुरक्षा रक्षक सक्षम, प्रशिक्षित असावेत आणि त्यांची पोलीस चारित्र्य पडताळणी (Character Verification) केलेली असावी.
११२ हेल्पलाईनचा वापर: महामार्ग व पर्यटनस्थळांवरील सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी व उद्योजकांनी तातडीने '११२' या हेल्पलाईनचा वापर करावा.
सायबर साक्षरता कार्यशाळा घेणार
वाढत्या डिजिटल फसवणुकीपासून उद्योग आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने लवकरच विशेष 'सायबर साक्षरता कार्यशाळा' आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
समन्वयाने पोषक वातावरण निर्माण होईल: आशिष नहार
'निमा'चे अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविकात पोलीस प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. उद्योग आणि पोलीस प्रशासन यांच्यातील हा संवाद अधिक दृढ झाल्यास नाशिक जिल्ह्यात अधिक सुरक्षित, सक्षम आणि गुंतवणुकीस पोषक औद्योगिक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला 'निमा'चे उपाध्यक्ष मनीष रावल व किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वढनेरे, सहसचिव किरण पाटील, संतोष मंडलेचा, तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व दत्तात्रय शिंदे उपस्थित होते. याशिवाय कार्यकारिणी सदस्य नितीन वागस्कर, कैलास आहेर, अखिल राठी, किरण जैन, कैलास पाटील, सुधीर बडगुजर, मिलिंद राजपूत यांच्यासह अनेक प्रमुख उद्योजक उपस्थित होते.