नाशिक, (प्रतिनिधी) १६ जुलै - नाशिक शहरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, वेगवेगळ्या भागांतून गेल्या दोन दिवसांत चार मुले गूढरित्या बेपत्ता झाली आहेत. यामध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. या सर्व मुलांना कोणीतरी फुस लावून किंवा जबरदस्तीने पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकारानंतर नाशिकमधील चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
केस १: भाभानगरमधून मुलगी बेपत्ता
पहिली घटना मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भाभानगर येथील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी मंगळवारी (दि. १४) सकाळपासून अचानक बेपत्ता झाली. ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार म्हैसधुणे पुढील तपास करत आहेत.
केस २: किराणा आणायला गेलेली मुलगी गायब
दुसरा धक्कादायक प्रकार गंगापूर रोडसारख्या उच्चभ्रू भागात घडला. आकाशवाणी केंद्र परिसरात राहणारी एक मुलगी बुधवारी (दि. १५) सायंकाळी घरासमोरील दुकानात किराणा माल आणण्यासाठी गेली होती. मात्र, दुकानात गेलेली ही मुलगी बराच वेळ झाला तरी घरी परतलीच नाही. परिसरात शोध घेऊनही तिचा सुगावा न लागल्याने अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त होत असून, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार पगार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
केस ३: सिन्नर फाट्यावरून अल्पवयीन मुलगा बेपत्ता
तिसरी घटना नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा येथे घडली. येथील खर्जुल सर्कल भागात राहणारा एक अल्पवयीन मुलगा बुधवारी (दि. १५) सकाळपासून घरातून बेपत्ता झाला आहे. घर परिसरातूनच त्याला कोणीतरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, हवालदार मोरे या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
केस ४: शाळेत गेलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही
चौथी घटना जेलरोड भागात उघडकीस आली आहे. येथील नवरंग कॉलनीत राहणारा एक शाळकरी मुलगा मंगळवारी (दि. १४) सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला होता. मात्र, तो शाळेत पोहोचलाच नसल्याची धक्कादायक माहिती नंतर समोर आली. तो घरी न आल्याने आणि नातेवाईकांकडेही मिळून न आल्यामुळे पालकांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उपनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, हवालदार झाडे पुढील तपास करत आहेत.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
अवघ्या ४८ तासांत शहराच्या वेगवेगळ्या भागांतून चार अल्पवयीन मुले गायब झाल्यामुळे नाशिककरांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये तीव्र भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुलांची पळवून नेणारी कोणती टोळी शहरात सक्रिय आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.