नाशिक, (प्रतिनिधी) १६ जुलै - लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी व शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि देशातील विद्यार्थी आंदोलनाला गती देण्यासाठी नाशिकमध्ये आगामी २० जुलै रोजी भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी हुतात्मा स्मारक येथे झालेल्या विविध परिवर्तनवादी, पर्यावरणवादी, संविधानप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
२० जुलैला सकाळी १० वाजता आंदोलनाची हाक
बैठकीत ठरल्यानुसार, रविवार, दि. २० जुलै रोजी सकाळी १० वाजता शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, त्यानंतर तिथेच तीव्र धरणे आंदोलन केले जाईल.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर धडक
बैठकीत वक्त्यांनी सांगितले की, सोनम वांगचूक हे शिक्षण व्यवस्था आणि लडाखच्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रश्नांवर दिल्ली येथे उपोषणाला बसले असून, देशभरातील विद्यार्थीही या आंदोलनात मोठ्या संख्येने उतरले आहेत. 'नीट' (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी २० जुलै रोजी दिल्लीत विद्यार्थ्यांसह संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. याच आंदोलनाला नाशिकमधूनही ऐक्य दर्शवण्यात येत आहे.
परीक्षा व्यवस्थेतील सुधारणेची मागणी
या बैठकीत देशातील परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेत तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचा ढासळलेला विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी नाशिकमधील कार्यकर्त्यांनी केली आहे.
बैठकीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीस डॉ. मिलिंद वाघ, मुकुंद दीक्षित, डॉ. डी. एल. कराड, कॉ. राजू देसले, रमेश अय्यर, श्यामला चव्हाण, महादेव खुडे, एस. के. लोहकरे, मुक्ता कावळे, राजकुमार सावंत, शिवदास म्हसदे, केशव निकुंबे, मिलिंद तेलुरे, रंजन लोंढे, तल्हा शेख, निशिकांत पगारे, भिला ठाकरे, संजय काळे, सलीम खान, प्रल्हाद मिस्त्री, भीमा पाटील, सूरज अकोलेकर, वसंती दीक्षित, मिलिंद जाधव, प्रकाश चौधरी, डॉ. अर्चना तोंडे, वसंत एकबोटे, डॉ. श्रीकांत बेनी, समाधान बागुल, प्राजक्ता कापडणे, राहुल गायकवाड, रमेश देवगिरे, आशिष निकम, राज माळी, शेख मोहम्मद जावेद, गौतम काँगळे, प्रकाश कनोजे, सुनील इंगळे, अलका एकबोटे, संजय सावळे, ॲड. गोदावरी देवकाटे, ॲड. प्रभाकर वायचाळे, ॲड. तानाजी जायभावे, अल्विन लोबो, ॲड. राम बागुल, ॲड. कृष्णा शिलावत, प्रवीण शिलावत, रोशन केदार, अनुप खैरनार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.