तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून आता ग्राहक पंचायतही आक्रमक... थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन केली ही मागणी...

Share:
Main Image
Last updated: 17-Jun-2026

पुणे, (प्रतिनिधी) १७ जून - अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या १५ दिवसांत आपल्या धडाकेबाज कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी आता ग्राहक संघटना आणि सर्वसामान्य नागरिक भक्कमपणे उभे राहिले आहेत. काही राजकारणी, भ्रष्ट अधिकारी आणि भेसळखोर व्यापाऱ्यांकडून मुंडे यांच्या बदलीसाठी सरकारवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, 'अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने' राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना थेट पत्र लिहून, "कोणत्याही दबावाला भिक न घालता तुकाराम मुंडेंना याच पदावर कायम ठेवावे," अशी आक्रमक मागणी केली आहे. गेल्या ५१ वर्षांपासून ग्राहक हितासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायतीच्या वतीने केंद्रीय महिला जागरण प्रमुख वीणा दीक्षित, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुर्यकांत पाठक, धनंजय गायकवाड आणि विजय सागर यांनी हे पत्र पाठवले आहे.

'मुंडेंच्या १५ दिवसांच्या धडाक्याने आमचे आरोप खरे ठरले'

"महाराष्ट्रातील जनतेला रोज विषयुक्त अन्न खावे लागत आहे. दुधातील भेसळ, हॉटेलमधील अस्वच्छता, हॉस्पिटल्समध्ये फार्मसीमधूनच औषधे घेण्याची रुग्णांवरील सक्ती यांबाबत आम्ही जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून अनेकदा पत्रे पाठवली; मात्र प्रशासनाने कधीच ठोस पावले उचलली नाहीत," अशी खंत ग्राहक पंचायतीने पत्रात व्यक्त केली आहे. मात्र, तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच अवघ्या १५ दिवसांत केलेल्या कारवाईमुळे ग्राहक पंचायतीने केलेले आरोप दुर्दैवाने खरे होते, हे सिद्ध झाले आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुंडेंनी १५ दिवसांत काय केले? (कारवाईचा धडाका):

भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त: पनीर, श्रीखंड, तूप यांमधील मोठी भेसळ उघडकीस आणून लाखो रुपयांचा माल जप्त केला. अस्वच्छ डेअरींवर थेट टाळे ठोकले.

हॉस्पिटल्सची सक्ती मोडीत काढली: रुग्णांना हॉस्पिटलमधीलच फार्मसीमधून औषधे घेण्याची असलेली बेकायदेशीर सक्ती मोडून काढली.

Advertisement

गुटखा माफियांचा कर्दनकाळ: पोलीस आणि एफडीएचे काही भ्रष्ट अधिकारी आर्थिक फायद्यासाठी ज्या गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष करत होते, त्यावर धाडी टाकून अवैध धंदे बंद केले.

फळ बाजारात जरब: आंबे पिकवण्यासाठी अपायकारक केमिकल पावडर वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली. (याच रासायनिक औषधांमुळे जपानने भारताचे आंबे परत पाठवले होते, याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.)

'राजकारणी आणि औषध कंपन्यांकडून बदलीसाठी दबाव'

तुकाराम मुंडे यांच्या या प्रामाणिक आणि तंतोतंत कायदेपालनामुळे सर्वसामान्य नागरिकांना विषमुक्त अन्नाचे नवे आयुष्य मिळाले आहे. मात्र, या कारवाईमुळे कोट्यवधींची काळी कमाई बुडालेले काही राजकारणी, भेसळखोर उद्योजक, व्यापारी, औषध कंपन्या आणि भ्रष्ट अधिकारी यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांवर मुंडेंच्या बदलीसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांतून समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांकडे सत्कार आणि संरक्षणाची मागणी

"राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता आपण किती विषारी अन्न खात होतो, याची जाणीव झाली आहे. नागरिकांना भयमुक्त करणाऱ्या या इमानदार अधिकाऱ्याचा शासनाने जाहीर सत्कार केला पाहिजे," अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे. तसेच, अजूनही केळी, डाळिंब, कलिंगड या फळांमध्ये दिली जाणारी विषारी इंजेक्शन्स रोखणे, मॉल्स आणि हॉटेल्समध्ये पाण्याची बाटली एमआरपीपेक्षा जास्त दराने विकण्याची लूट थांबवणे बाकी असल्याने मुंडेंचे या पदावर राहणे अत्यंत गरजेचे आहे.

या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सरकार बळी पडणार नाही यासाठी लवकरच महाराष्ट्रातील हजारो नागरिक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना 'सामुहिक पत्रे' पाठवून आपला रोष व्यक्त करणार असल्याचा इशाराही ग्राहक पंचायतीने दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.