शिर्डीतून देशाच्या संरक्षणाला बळ... ३०० किमी पल्ल्याच्या 'सूर्यास्त्र'चे अनावरण... या कारखान्यात बनणार तोफगोळे...

Share:
Main Image
Last updated: 24-May-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) २४ मे - "जो देश स्वतःची शस्त्रास्त्रे स्वतः बनवतो, तो आपले भविष्य स्वतः घडवतो," असा विश्वास देशवासीयांना देत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताला संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात पूर्णपणे आत्मनिर्भर बनवण्याचे आवाहन केले. शनिवार, २३ मे २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे खाजगी क्षेत्रातील 'निबे समूह' (Nibe Group) च्या बहुउद्देशीय संरक्षण उत्पादन संकुलाचे शानदार उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारताची पहिली ३०० किलोमीटर पल्ल्याची युनिव्हर्सल रॉकेट प्रक्षेपण प्रणाली ‘सूर्यास्त्र’ हिला हिरवा झेंडा दाखवून देशार्पण करण्यात आले. तसेच या प्रणालीसाठी लागणाऱ्या क्षेपणास्त्र संकुलाची पायाभरणीही यावेळी करण्यात आली.

युद्धात आता सैनिकांच्या संख्येपेक्षा तंत्रज्ञान महत्त्वाचे
उपस्थितांना संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "भविष्यातील युद्धांचे निकाल हे सैनिकांच्या संख्येवर नव्हे, तर दारुगोळा आणि स्वयंचलित (ऑटोमेटेड) प्रणालींच्या प्रगतीवर अवलंबून असतील. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्ष आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवरून हे स्पष्ट होत आहे." भारताने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान या क्षमतेचे यशस्वी दर्शन घडवले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश सैनिकांची क्षमता वाढवणे हा आहे, मात्र अंतिम निर्णय नेहमी माणसाच्या हातातच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खाजगी क्षेत्राचे योगदान २५ ते ३० टक्क्यांवर; ५० टक्क्यांचे लक्ष्य
पूर्वी संरक्षण उत्पादन केवळ सार्वजनिक कारखाने आणि आयुध निर्माणी पुरतेच मर्यादित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले.
"एक काळ असा होता जेव्हा संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचे योगदान नगण्य होते. आज ते २५ ते ३० टक्क्यांवर पोहोचले असून, आगामी काळात ते ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हा नवा भारत आहे; इथे आता खाजगी क्षेत्र केवळ नट-बोल्ट पुरवत नाही, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली विकसित करत आहे," असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

Advertisement

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान अनावरण:
'सूर्यास्त्र' रॉकेट प्रणाली: स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित ही प्रणाली भारताची हल्ला करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढवेल.
नवे प्लँट्स: स्वदेशी टीएनटी (TNT) आणि आरडीएक्स (RDX) प्लँट तंत्रज्ञानासह रिन्यूएबल बायो-एनर्जी कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्राचे अनावरण.
जागतिक भागीदारी: सॅटेलाइट असेंब्लीच्या क्षेत्रात 'निबे ग्रुप' आणि आंतरराष्ट्रीय कंपनी 'ब्लॅक स्काय' यांच्यात सामंजस्य कराराची (MoU) देवाणघेवाण.
स्थानिक रोजगार निर्मिती: हे संकुल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) पुरवठा साखळी निर्माण करेल, ज्यामुळे स्थानिक तरुणांना तांत्रिक कौशल्यासह मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल.

'मेक-इन-इंडिया'मुळे देशाचे संरक्षण क्षेत्र मजबूत: मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक-इन-इंडिया' उपक्रमांच्या यशाबद्दल केंद्र सरकारचे कौतुक केले. "सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या समान सहभागामुळे भारताच्या संरक्षण परिसंस्थेत क्रांतिकारक बदल झाला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे भारतीय सैनिकांचे शौर्य आणि देशाच्या वाढत्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. भारत आपली शक्ती वाढवत असतानाच जागतिक शांततेसाठीही रचनात्मक भूमिका बजावत आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

दिग्गजांची उपस्थिती
या कार्यक्रमादरम्यान एमएसएमई उद्योगांच्या संरक्षण क्षमतांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या सोहळ्याला देश-विदेशातील उद्योगपतींसह संरक्षण दल प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार, तसेच डीआरडीओ (DRDO) चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत आणि वरिष्ठ लष्करी व नागरी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.