मुंबई, (प्रतिनिधी) १४ मे - पंतप्रधानांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सत्ताधारी गोटात सुरू झालेल्या 'बाईक सफारी' आणि 'पायदळ' प्रवासावरून विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मोहिमेत सातत्य असण्याची गरज व्यक्त केली असतानाच, विजय वडेट्टीवार आणि अंजली दमानिया यांनी याला 'दिखावा' आणि 'पब्लिसिटी स्टंट' म्हणत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे.
'मुख्यमंत्र्यांनी रोज मंत्रालयात बाईकवर यावे' - शरद पवार
पुण्यात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधानांचे आवाहन गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली. मात्र, इंधन बचत ही केवळ एक-दोन दिवसाची गोष्ट नसून त्यात सातत्य हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. "एका मंत्र्याकडे पूर्वी १७ गाड्या होत्या, त्या आता ८ वर आल्याचे ऐकून धक्का बसला. ताफा सोडणाऱ्या मंत्र्यांनी दिखावा करू नये. जर मुख्यमंत्री उद्यापासून रोज मंत्रालयात बाईकवरून आले, तरच लोक या मोहिमेला गांभीर्याने घेतील," असा टोला पवारांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या बुलेटचे 'PUC' संपले?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलेट सफारीवरून गंभीर आरोप केला आहे. "मुख्यमंत्र्यांनी पब्लिसिटी स्टंटसाठी बुलेट चालवली खरी, पण त्या गाडीचे PUC एक्सपायर झाले आहे. सामान्य माणसांना दंड ठोकणारे पोलीस आता मुख्यमंत्र्यांची पावती फाडणार का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
ही 'देशभक्ती' नाही, तर 'फोटोभक्ती'!
सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सत्ताधाऱ्यांच्या या उपक्रमाची 'फोटो ड्रामा' म्हणून संभावना केली. "फडणवीसजी, तुम्ही एक दिवस बुलेटवर आलात, पण बाकी दिवस काय? मंत्री नितेश राणे एक दिवस पायी चालले, मग बाकी ३६४ दिवस काय करणार? कायमचा ताफा बंद करा, तेव्हाच त्याला खरी देशभक्ती म्हणता येईल," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या 'इव्हेंट'वर प्रहार केला.