पावसाची धाकधूक बंद होणार... आता १० वर्षांचा अंदाज मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 24-Feb-2026

पुणे, (प्रतिनिधी) २४ फेब्रुवारी - भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मान्सूनबाबत हवामान संशोधनात एक मोठी क्रांती झाली आहे. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (IITM) शास्त्रज्ञांनी ‘दशक हवामान अंदाज प्रणाली’ (Decadal Prediction System) विकसित केली आहे. यामुळे आता केवळ एका हंगामाचाच नव्हे, तर आगामी १० वर्षांच्या पावसाचा आणि हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे.

संशोधनाचे वैशिष्ट्य काय?
संस्थेच्या आधीच्या ‘पृथ्वी प्रणाली नमुन्यावर’ (Earth System Model) आधारित हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, यामुळे हवामान अंदाजात राहणाऱ्या त्रुटी आता लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. प्रशांत आणि अटलांटिक महासागरात होणाऱ्या हालचालींचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होतो, हे या प्रणालीमुळे अधिक वास्तववादी पद्धतीने मांडता येणार आहे.

या प्रणालीचे मुख्य फायदे:
पर्जन्यमान: भारतातील मुख्य मान्सून पट्ट्यात नक्की किती पाऊस पडेल, याचे स्पष्ट चित्र मिळणार.
तापमान बदल: पुढील दशकात तापमानात होणारी वाढ किंवा बदल यांचे अचूक विश्लेषण.
जागतिक परिणाम: एल-निनो आणि ला-निना यांसारख्या जागतिक हवामान बदलांचे मान्सूनवरील परिणाम आधीच समजतील.

धोरणकर्त्यांसाठी ‘गेम चेंजर’
हा अंदाज केवळ पावसापुरता मर्यादित नसून, देशाच्या विकासासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
शेती नियोजन: दीर्घकालीन पीक पद्धती ठरवणे सोपे होईल.
जलव्यवस्थापन: धरणे आणि पाण्याचे साठे यांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करता येईल.
आपत्ती व्यवस्थापन: दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या संकटांसाठी प्रशासन आधीच सज्ज राहू शकेल.
"हवामान संशोधनातील ही एक मोठी झेप असून, यामुळे देशाच्या धोरणात्मक नियोजनाला मोठी मदत होईल," असा विश्वास संशोधक टीमने व्यक्त केला आहे.

टीम ‘आयआयटीएम’चे यश
हे महत्त्वपूर्ण संशोधन पी. व्ही. राजेश, रोसिमिथा पांडा, सी. ज्ञानसीलन, राहुल पै, रश्मी काकटकर, दर्शना पाटेकर, जे. एस. दीपा, ए. जी. प्रजीश, अमित कुमार शर्मा, टी. एस. फौसिया, सुब्रता हलदर, अनिला सेबॅस्टियन, अनंत पारेख आणि सैकत प्रमाणिक या शास्त्रज्ञांच्या टीमने पूर्ण केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.