नाशिक, (प्रतिनिधी) २० फेब्रुवारी - महाराष्ट्रात अंनिस च्या माध्यमातून अनेक जातपंचायती बरखास्त झाल्या आहे. आज नाशिकमध्ये राज्यातील चित्रकथी जातपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. समाजबांधवांनी अनेक पुरोगामी व क्रांतिकारी निर्णय घेतले आहे.
महाराष्ट्र अंनिसचे जातपंचायत मुठमाती अभियान व भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नांना हे यश आले आहे. राज्यभरातून आलेल्या चित्रकथी समाजबांधव, भटके विमुक्त समाज बांधवांनी हा निर्णय घेतला. जातपंचायत बरखास्तीसह आंतरजातीय विवाहास मान्यता देण्यात आली. बाल विवाहास बंदी घालण्यात आली. कोणत्याही कारणाने वाळीत टाकणे, आर्थिक दंड करणे यावर प्रतिबंध करण्यात आला. बहिष्कृत कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.या निर्णयामुळे त्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. इतर समजबांधवांनी आनंद व्यक्त केला. भटके विमुक्त समाजातील कुप्रथा व अंधश्रद्धा याविरोधात एकत्रितपणे काम करण्याचे ठरले गेले . नंदुरबार, अहिल्यानगर व राज्यातील अनेक जिल्ह्यातून आलेले समाजबांधव उपस्थित होते.
एक महिलेला आंतरजातीय विवाह केल्याने व बहिष्कृत असल्याने तिला पाच वर्षापासून माहेरी व समाजात जाता आले नव्हते. ती सदर कार्यक्रमास उपस्थित होती. आजच्या निर्णयामुळे तिला पुढील आठवड्यात होणाऱ्या तिच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहता येईल. त्यामुळे तिने आनंद व्यक्त केला.हुतात्मा स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाच्या प्रस्ताविका वाचनाने झाले.जात पंचायत बरखास्तीचा निर्णय घेतल्याने चित्रकथी समाजातील व्यक्तींना संविधानाची प्रस्ताविका देऊन सन्मानित करण्यात आले. पारंपारिक न्यायदान ऐवजी सविधानाला अभिप्रेत असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत आल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.या प्रक्रियेत विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम
गोऱ्हे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा चांदगुडे यांनी केले. आभार डॉ.टी.आर.गोरणे यांनी मानले.यावेळी कोमल वर्दे,मनीषा अटक,जगदीश चित्रकथी,प्रवीण शिंदे, गणेश चित्रकथी, विनोद शिंदे , निंबा जाधव, गोपीचंद इंगळे ,आदी उपस्थित होते.
“जातपंचायत संविधान विरोधी (अ)न्याय व्यवस्था आहे. आणखी एक जातपंचायत बरखास्त झाल्याने लोकशाही बळकट होण्यास मदत होईल . आम्ही संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो व आभार मानतो “
-कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह,
जातपंचायत मुठमाती अभियान.
“ अंनिस च्या जातपंचायत मुठमाती अभियानाला आम्ही पाठिंबा देत आहोत. म्हणून आम्ही पुरोगामी निर्णय घेतले आहे.येणाऱ्या काळात आम्ही समाज प्रबोधनाची कामे सोबत करणार आहोत.”
-जगदीश चित्रकथी, पदाधिकारी
चित्रकथी समाज